४ .1857 चा स्वातंत्र्य लढा




१ : दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 
(उमाजी नाईक, स्वातंत्र्य समर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे) 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले 
रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
१८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 
भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी. या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला. 
➤उत्तर➤ ओडिशातील राजांनी पाइकांना जमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या. त्या कसुन ते आपला उदरनिर्वाह करत. त्या बदल्यात युद्ध प्रसंगात त्यांनी आपल्या राजांच्या बाजूने लढाईला उभे राहायचे अशी अट होती.इ.स. १८०३ मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेऊन पाइकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्यामुळे पाइक संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.

(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

➤उत्तर➤ १८५६ साली ब्रिटिशांनी हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका देऊन त्याचा वापर करण्यासाठी नवी काडतुसे दिली. ब्रिटिशांनी दिलेल्या नवीन काडतुसांवरील आवरणे दाताने तोडावे लागे. या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली. हिंदूंना गाय पवित्र होती तर डुक्करे हे मुस्लिमांना निषिद्ध होते. त्यामुळे हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. 

➤उत्तर➤ १८५७ च्या लढ्यात भारतीय सैनिकांकडे शौर्य होते. परंत योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आला नाही. या सैनिकांनी दिल्ली जिंकल्यानंतर ती त्यांना टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. तर इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते. तेथील दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत. त्यामुळे भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही.

(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. 
➤उत्तर➤ इंग्रजी सैन्याचे लष्करातील प्रमाण वाढवण्यात आले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणूका महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आल्या. तसेच तोफखाना पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात ठेवण्यात आला. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात पुन्हा उठाव करणार नाहीत म्हणून स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.

(५) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले.
➤उत्तर➤ इंग्लड या आधुनिक राष्ट्रामध्ये ओद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. इंग्रजांना आर्थिक उत्पन्न वाढवायचे होते. इंग्लडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले.
प्रश्न ३ रा : पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती ? 
➤उत्तर➤ १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामागे पढील सामाजिक कारणे होती. इंग्रजांनी भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रुढी यांत हस्तक्षेप केला. सतीबंदीचा कायदा, विधवाविवाहाचा कायदा, ज्यांनी धर्मांतर केले होते त्यांचे वारसाहक्क अबाधित ठेवणारा कायदा अशा विविध सुधारणा केल्याने परकीय सरकार आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट झाले.




(२) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले ? 
➤उत्तर➤ १८५७ च्या उठावामध्ये एकसूत्रता व एककेंद्री नेतृत्व नव्हते. उठाव करणाऱ्या भारतीयांजवळ पुरेशी आधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती. या उठावापासून बहुसंख्य संस्थानिक, सुशिक्षित भारतीय वर्गव राजेरजवाडे अलिप्त राहिले. या शिवाय दक्षिण भारतात हा उठाव पसरला नाही. भारतीय सैन्यांकडे शौर्ये होते. परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. एककेंद्री नेतृत्व, शिस्तबद्ध सैन्य, अनुभवी सेनानी, अद्ययावत आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दळणवळणाची साधने इत्यादी सुसज्ज सोयी असलेल्या इंग्रजांपढे भारतीयांचा निभाव लागला नाही. त्यामुळे १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश आले.


(३) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा.
➤उत्तर➤ इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे उठाव झाल्याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही, अशी धारणा झाल्याने १८५८ साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. त्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून १८५८ मध्ये जाहिरनामा काढून आश्वासने दिली. हा उठाव पुन्हा होऊ नये यासाठी इंग्रजांनी लष्कराची पुनर्रचना केली. तसेच आपल्या अंतर्गत धोरणात बदल करून भारतीयांच्या सामाजिक, धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही, असे धोरण इंग्रजांनी स्विकारले.‘फोडा व राज्य करा या नीतीचा वापर करून भारतीयांची एकजूट होऊ नये, म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले.


(४) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले ? 
➤उत्तर➤ इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्विकारले. तसेच भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील, एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील. हे धोरण राबविले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र झाले.

Post a Comment

0 Comments